राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पवार साहेबांनी मला भरपूर संधी दिल्या. तब्बल सात वर्षे मी या पदावर काम केले. आता नव्या चेहऱ्यांना संधी देणं गरजेचं आहे. तुमच्यासमोरच मी साहेबांना विनंती करतो, शेवटी हा पक्ष पवार साहेबांचाच आहे. त्यांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे, असे त्यांनी म्हटले होते. आता जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होताच आता त्यांना अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगतापयांनी ऑफर दिली आहे.
जयंत पाटील यांनी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा शनिवारी शरद पवारांकडे सोपवल्याची चर्चा सुरु होत आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार गटाचं प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार कोण स्वीकारणार, याकडे लक्ष लागलं आहे. येत्या १५ जुलै रोजी मंगळवारी शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे जयंत पाटील पक्षात कोणती भूमिका निभावणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान जयंत पाटील यांना अजित पवार गटाकडून मोठी ऑफर मिळाली आहे.
जयंत पाटील यांचं अजित पवार गटात स्वागत करू, असं अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे. संग्राम जगताप म्हणाले की, ‘राष्ट्रवादीत ते अस्वस्थ आहेत, असं बोललं जायचं. अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. ते अजित पवार गटात आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचं स्वागतच करतील’.
दरम्यान,जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावर खासदार अमर काळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अमर काळे म्हणाले, ‘जयंत पाटील यांच्या कार्यालयातून सुद्धा दोन दिवसांपूर्वी फोन आला होता. परंतु आज जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. पंधरा तारखेला शरद पवार यांच्या नेतृत्वात असलेल्या बैठकीला पक्ष संघटनेच्या संदर्भात शरद पवार काय निर्णय घेतील हे कळेल. जयंत पाटील यांनी समर्थपणे राष्ट्रवादीची बाजू सांभाळली. पण निश्चितच काही वर्षात बदल करणे अपेक्षित असतो’.


