Friday, March 13, 2026

नगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस ; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्ह्याच्या काही भागात २५ व २६ जुलै रोजी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर, दि. २५- जिल्‍ह्याच्या काही भागात दि. २५ जुलै २०२५ रोजी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून दि. २६ जुलै २०२५ रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे. जिल्‍ह्यासाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी करण्‍यात आलेला आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचे व मुसळधार पर्जन्यमान झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा, प्रवरा, गोदावरी, सीना तसेच हंगा या नदीकाठावरील तसेच मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोतुळ येथून मुळा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरु असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे.

मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्‍वजांचे खांब, विद्युत / दिव्‍यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्‍या अधांतरी लटकणाऱ्या किंवा लोंबकळणाऱ्या केबल्‍स पासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्‍ज्) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्‍यासाठी दक्षतेची बाब म्‍हणून जाहिरात फलकांच्‍या (होर्डिंग्‍ज) आजूबाजूला थांबू नये व योग्‍य ती दक्षता घ्‍यावी.

वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्‍यास सुरक्षेसाठी गुडघ्‍यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्‍ही गुडघ्‍यांच्‍यामध्‍ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.

धरण व नदीक्षेत्रामध्‍ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्‍यावी. धरणाचे पाण्‍यात वा नदीच्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहामध्‍ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्‍फी (Selfie) काढू नये. वादळी वारा, पाऊस व गारपीट यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्‍यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.

शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्‍ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्‍याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्‍यावी.जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतर करावे.

वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्‍वत:सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्‍टेशन किंवा जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्‍वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४ अथवा २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles