अहिल्यानगर – शहरातील सावेडी नाका परिसरात मनमाड महामार्गावर चार वाहनांच्या विचित्र अपघातात सहा जण जखमी झाले. अहिल्यानगरहून मनमाडच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या स्कॉर्पिओवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला समोरून येणाऱ्या चारचाकीला धडकली. त्यानंतर एक रिक्षा व रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका दुचाकीलाही उडवले. दुचाकीला फरफटत नेत शेजारील गवतात कार अडकली. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात घडला.
स्कॉर्पिओ कार भरधाव वेगात असताना दुभाजकाला घासली गेली व त्यानंतर पलटी होऊन विरुद्ध दिशेला वाहनांवर धडकली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेनंतर महामार्गावर सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तो पर्यंत नागरिकांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. या अपघातात आशा रामचंद्र कुसळकर (वय ६३) यांचा मृत्यू झाला असून , अंकुश रामचंद्र कुसळकर (वय ४०, दोघे रा. श्रीगोंदा), अविष्कार सुभाष वाघ (वय २४, रा. पिंपळगाव माळवी, ता. अहिल्यानगर ), बबन भाऊसाहेब घोरपडे (वय ४९, रा. नेप्ती, ता. अहिल्यानगर) हे जखमी झाले आहेत.


