मुंबई: दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनावर शंका उपस्थित करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बड्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन चौकशीची मागणी केली. त्यातच, काल त्यांनी बारामती पोलीस स्टेशनमध्ये व्हीएसआर कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या केला होता. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने त्यांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. रोहित पवार पत्रकार परिषदेतून सातत्याने अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यावर, आता राष्ट्रवादीच्या आमदारांनी पलटवार केला आहे. आमदार अनिल पाटील आणि सुनिल शेळके यांनी रोहित पवारांवर हल्लाबोल केला. हे नाटक करायची गरज नाही, असे आमदार शेळकेंनी म्हटलं. तर, रोहित पवारांना पक्षाचा कब्जा हवा आहे, त्यासाठीच ते आमच्या नेत्यांवर खापर फोडत आहेत, असा पलटवार अनिल पाटील यांनी केला आहे.
अजित दादांवर जर तुमचं खरं प्रेम असेल तर नाटक करायची काही गरज नाही. रोहित पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, रोहित पवार काही एजन्सी नाहीत, त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी तपास यंत्रणांकडे द्यावेत, असे आमदार अनिल पाटील यांनी म्हटले. जर त्यांना सुनेत्रा पवार यांच्याबद्दल एवढंच वाटत आहे तर जेव्हा त्या राष्ट्रीय अध्यक्ष होत आहेत, तेव्हा त्यांना सोडून जायला नको होतं. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार पत्रकारांना थोड्या दिवसात बोलतील. अमोल मिटकरी असेल किंवा आम्ही सगळे आमदार असू, आमचं एकच म्हणणं आहे की सगळ्या घटनेचा तपास झाला पाहिजे, सत्य बाहेर आलं पाहिजे आणि यंत्रणा ते काम करतील, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
रोहित पवारांना कब्जा पक्षाचा हवा आहे, त्यासाठी ते आमच्या नेत्यांवर खापर फोडत आहेत, असा गंभीर आरोपही अनिल पाटील यांनी रोहित पवारांवर केला आहे. राज ठाकरे असतील किंवा रोहित पवार असतील ते काहीही बोलू द्यात, यंत्रणा योग्य तो तपास करतील, असेही पाटील यांनी म्हटले.


