राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी निवडणूक होत असून 7 फेब्रुवारी रोजी मतदान आहे. तर, 9 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मतदान प्रक्रियेसाठी सर्व तयारी पूर्णत्वास येत आहे. राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने शासकीय दु:खवटा पाळण्यात आल्याने निवडणुकांची तारीख दोन दिवस पुढे ढकलण्यात आली. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आपल्या सर्वच सभा रद्द केल्या आहेत. तर, स्थानिक नेत्यांकडून जिल्हा पातळीवर प्रचारसभा होत आहेत. त्यातच, मतदानाच्या तयारीला लागलेल्या कार्यकर्ते आणि मतदारांसाठी प्रशासनाने गुडन्यूज दिली आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. या निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून, त्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. या ॲपमध्ये मतदाराचे नाव शोधण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार मतदाराचे संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येते. ॲपच्या माध्यमातून आपले मतदान केंद्रही कळू शकेल, असेही आयोगाने सांगितले.
दरम्यान, याशिवाय मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यातील Search Name in Voter List वर क्लिक करून मोबाईल ॲपप्रमाणेच ‘नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करुन नाव शोधता येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
लातूर जिल्ह्यातील हरंगुळ पंचायत समिती गणातील खाडगाव गावात जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी गंभीर प्रकार समोर आला आहे. या गावातील तब्बल 2789 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे उघड झाले आहे. अनेक नागरिकांनी याआधी नियमित मतदान केले असतानाही यावेळी त्यांची नावे यादीत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात उमेदवारांच्या कुटुंबीयांसह सरपंच यांच्या पत्नीचे आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांची नावेही मतदार यादीत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा प्रशासकीय गोंधळ की हेतुपुरस्सर केलेली चूक, असा सवाल उपस्थित झाला आहे.


