केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासादरम्यान आता एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयलला अॅडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी तब्बल १० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस बजावली आहे. साहिल गोयल यांनी केलेल्या कथित आरोपांमुळे आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला आणि प्रतिमेला गंभीर धक्का बसल्याचा दावा श्रीवास्तव यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सिया गोयलने न्यायालयासमोर एक महत्त्वाचे विधान केले. “माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून अॅडव्होकेट विपुल दुशिंग आहेत,” असे तिने स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे. या वक्तव्यानंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, याच पार्श्वभूमीवर आशुतोष श्रीवास्तव यांनी साहिल गोयलविरोधात कायदेशीर पाऊल उचलले आहे.
श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, साहिल गोयल यांनी त्यांच्याविरोधात खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप केले. या आरोपांमुळे त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीवर तसेच सामाजिक प्रतिमेवर विपरीत परिणाम झाल्याचा दावा नोटिशीत करण्यात आला आहे. वकिली व्यवसायात विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे अशा प्रकारच्या आरोपांमुळे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. कायदेशीर नोटिशीत साहिल गोयल यांनी केलेले सर्व आरोप तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सार्वजनिकरीत्या माफी मागणे, भविष्यात अशा प्रकारचे आरोप न करण्याचे लेखी आश्वासन देणे आणि झालेल्या मानसिक, सामाजिक व व्यावसायिक नुकसानीपोटी १० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देणे, अशा मागण्यांचाही समावेश आहे.
दरम्यान, या नोटिशीनंतर प्रकरणाची चर्चा अधिकच रंगली असून, साहिल गोयल यांची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते या नोटिशीला कायदेशीर उत्तर देणार की आरोपांबाबत स्पष्टीकरण सादर करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


