अहिल्यानगर-श्रीराम फायनान्सकडून लिलावातील वाहन खरेदी करण्यासाठी 25 लाख रूपये दिल्यानंतरही वाहन न मिळाल्याने व पैसेही परत न मिळाल्यामुळे एका शेतकर्याने मानसिक तणावात येऊन विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना वडगाव गुप्ता (ता. अहिल्यानगर) येथे घडली आहे. सोपान जगन्नाथ गिते (रा. धुमाळ वस्ती, वडगाव गुप्ता) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे.दरम्यान, सदरची घटना 8 जुलै रोजी घडली असून यासंदर्भात मयत सोपान गिते यांच्या पत्नी मिनाबाई सोपान गिते (वय 60 रा. धुमाळ वस्ती, वडगाव गुप्ता) यांनी 26 जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी श्रीराम फायनान्सच्या रिकव्हरी एजंटसह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. श्रीराम फायनान्सचा रिकव्हरी एंजट योगेश मोहन कापसे (रा. बाराबाभळी, ता. अहिल्यानगर), एन. के. भुजबळ (पत्ता माहिती नाही) व पवन रमेश भालेराव (रा. चेतना कॉलनी, एमआयडीसी, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
सोपान गिते यांनी लिलावातील वाहन खरेदी करण्यासाठी श्रीराम फायनान्सशी संबंधीत तिघांकडून 25 लाख रूपये दिले होते. मात्र, संबंधित फायनान्स कंपनीकडून ना वाहन मिळाले ना पैसे परत. त्यातून सुरू झालेल्या मानसिक तणावामुळे आणि संशयित आरोपींच्या धमक्यांमुळे शेवटी त्यांनी 8 जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास विषारी औषध सेवन करून जीवन संपवले. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी करीत आहेत.


