अहिल्यानगरमधील सरोदे कुटुंब 51 गुंठे हक्काच्या जमिनीसाठी गेल्या 12 वर्षांपासून संघर्ष करत होतं. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातबारा मिळाला…
अहिल्यानगरमधील एका शेतकऱ्याला न्याय मिळाला. चिंचोडी पाटील येथील कौसाबाई मारुती सरोदे यांच्या 51 गुंठे जमिनीच्या बेकायदेशीर हस्तांततरण प्रकरणात निर्णय झाला. गेली अनेक वर्षे तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही न्याय न मिळाल्याने, सरोदे कुटुंब आणि ग्रामपंचायत सरपंच शरद पवार यांनी मागील महिन्यात आंदोलनाचा वेगळा मार्ग निवडला होता. त्यांच्या घराचा संसार, शेळ्या-मेंढ्या घेऊन त्यांनी तहसील कार्यालयात 9 दिवसांचे बेमुदत आंदोलन सुरू केले होते.सदर प्रकरणाची माहिती पांडुरंग दातीर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांना दिली. त्यानंतर कदम यांनी तात्काळ जिल्हाधिकारी आणि तहसीलदार, अहिल्यानगर यांच्याशी संपर्क साधून त्वरित कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या तत्परतेमुळे तहसीलदारांनी सरोदे कुटुंबाच्या नावावर जमिनीचा फेरफार आदेश जारी केला. यानंतर सरोदे कुटुंबाने आपले उपोषण थांबवले.
आज मंत्रालयात कौसाबाई सरोदे व त्यांच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन घोंगडी, पिवळा फेटा व भंडारा देऊन सन्मान केला. यावेळी सरपंच शरद पवार, सूर्यभान सरोदे, चंद्रकांत पवार, अभिषेक कदम, युवराज हजारे, किरण मोरे हे उपस्थित होते.दरम्यान, गेल्या 12 वर्षाच्या संघर्षानंतर शेतकऱ्याला न्याय मिळाला आहे. जेव्हा प्रशासन सजग असतं आणि नेतृत्व जनतेप्रती संवेदनशील असतं, तेव्हा न्याय मिळतो आणि जनतेचे प्रश्नही सुटतात, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.


