आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार ठाकरे गटाकडून BMC निवडणुकीसाठी उमेदवारी देताना ज्येष्ठ नगरसेवकांऐवजी तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटात नवीन चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. तर 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नाही. यामुळे ठाकरे गटात प्रचंड मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नगरसेवक नाराज झाल्यास ते वेगळी भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे आता या संभाव्य निर्णयाचे ठाकरे गटात काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ज्येष्ठ नगरसेवकांना उमेदवारी दिली जाणार नसली तरी माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार ठाकरे गटाकडून सुरु आहे. यामुळे पक्षात नवे व जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखून ठाकरेंच्या सेनेचे किमान 70 टक्के नवे चेहरे उमेदवार असतील. त्यानुसार मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी रणनीती आखत आहेत.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्याप युतीची घोषणा केली नसली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संयुक्त बैठका झाल्या आहेत. यामध्ये प्रत्येक वॉर्डातील दोन्ही पक्षांची ताकद आणि प्रभाव याचा विचार करून जागावाटपाचा विचार केला आहे. शिवसेनेने 2017 च्या महापालिका निवडणुकीत 84 जागा जिंकल्या होत्या. मात्र, त्यातील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांच्या जागी नवीन चेहरे मैदानात उतरविण्यात येणार आहेत. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारीची संधी दिली जाणार नाही. परंतु, त्यांच्या वॉर्डातील उमेदवार निश्चित करताना त्यांचे अनुभव, पक्षातील योगदान लक्षात घेऊन त्यांचेही मत विचारात घेतले जाणार आहे. यामुळे नव्या पिढीला संधी मिळून पक्षात तरुण नेतृत्वाचा सहभाग वाढेल.


