नगर तालुका पोलीस ठाण्यात खूनप्रकरण दडपल्याचा आरोप; सामाजिक कार्यकर्त्याचे पोलिस अधीक्षकांकडे निवेदन
अहिल्यानगर :
नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी पैशांच्या मोबदल्यात खूनप्रकरण दडपल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ चितळकर यांनी केला आहे. त्यांनी याबाबतचे सविस्तर निवेदन मा. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे.
निवेदनानुसार, ६ मार्च २०२५ रोजी आरणगाव परिसरात मिठु कार्तीक दत्त (४२) याला कोमल फरसान दुकानाचे मालक भाऊसाहेब नांगरे यांनी हातोड्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. जखमी अवस्थेत दत्त यांना पॅसिफिक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्याचा एमएलसी क्रमांक 394/03/2025 नोंदवला गेला होता.चौकशीदरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीकडून मध्यस्थामार्फत १० लाख रुपये घेत गुन्हा नोंदवू नये, असा दबाव पोलीस अधिकाऱ्यावर आणण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पुढे जखमी दत्त यांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र २३ मार्च २०२५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.चौकशी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये केवळ “आकस्मात मृत्यू” नोंदवून प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप देखील निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित खूनप्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लपवून ठेवण्यात आल्याचा चितळकरांचा दावा आहे.सोमनाथ चितळकर यांनी मागणी केली आहे की,खूनाचा गुन्हा तात्काळ नोंदवावा,आरोपींवर कठोर कारवाई करावी,तसेच गुन्हा दडपण्यात सहभागी सर्वांवर, त्यात एपीआय प्रल्हाद गिते यांच्यावरही कारवाई करण्यात यावी.चौकशीची कारवाई पुढील ७ दिवसांत लेखी स्वरूपात कळवावी, अशीही विनंती त्यांनी केली आहे.तक्रारदाराने एसपींना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याला न्याय मिळावा म्हणूनच मी हे प्रकरण उघड केले. आरोपींनी गुन्हा दडविला, तर अधिकार्यांनी याला सहकार्य केले. त्यामुळे अधिकारीही या गुन्ह्यात जबाबदार धरणे आवश्यक आहे. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार प्रकाशात आल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यपध्दतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता जिल्हा पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात, खरोखर स्वतंत्र चौकशी होते की प्रकरण पुन्हा धुळफेक होईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संबंधीत मयत व्यक्तीचा ‘व्हिसेरा’ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. मात्र या व्हिसेरा चाचणीचा अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूबाबत निष्कर्ष नोंदविता येणार आहे. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– प्रल्हाद गिते, सहायक पोलीस निरीक्षक.


