श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोगरगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथे 2009 सालच्या बारावी कला बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाला 117 पुस्तकांची भेट देत सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. अंदाजे20,000 रुपये किमतीची ही पुस्तके विद्यालयाच्या ग्रंथालयाला सप्रेम अर्पण करण्यात आली असून ग्रंथालय समृद्धीच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या उपक्रमात किशोर गुंजाळ, पत्रकार उज्वला उल्हारे , शितल बेरड, गौतम गारुडकर यांच्यासह इतर अनेक माजी विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले. शिक्षणसंस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, पुढील पिढीला समृद्ध वाचनसाहित्य उपलब्ध करून देण्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य वसंत नरवडे यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करताना, माजी विद्यार्थ्यांनी केलेली पुस्तक भेट ही आमच्या ग्रंथालयाच्या विकासात मोलाची भर असून सध्याच्या तसेच भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके मोठा आधार ठरतील,असे प्रतिपादन केले.
यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रवीणकुमार लोंढे, गुरुकुल प्रमुख दत्तात्रय हजारे, तसेच सर्व सेवकवृंद उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी माजी विद्यार्थ्यांच्या या सामूहिक प्रयत्नाचे विशेष कौतुक केले व हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त केली.
या पुस्तक भेटीमुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील वाचनसामग्री सहज उपलब्ध होणार असून अभ्यासाबरोबरच वाचनाची सवय प्रोत्साहन मिळेल. एकूणच, विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी दाखवलेली सामाजिक जाणीव व शैक्षणिक संस्थेबद्दलची कृतज्ञता ही भावी पिढीसाठी आदर्श ठरेल.


