मंबई: जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा ही आज होणार आहे. बारा जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा आज केली जाईल. आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे, या पत्रकार परिषदेमध्ये या निवडणुकीची घोषणा होईल. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक ही दुसऱ्या टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे. याबाबत पंधरा दिवसांची मुदतवाड देखील देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 15 फेब्रुवारी पर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. नेमक्या कधी या निवडणुका होतील याची तारीख आज जाहीर केली जाईल. आज दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद पार पडणार असल्याची माहिती आहे. पुणे, सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषद निवडणुकींचे बिगुल वाजणार आहे. आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच १२ जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागू होणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निवडणुका घेण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, राज्यातील आरक्षणाच्या स्थितीमुळे निवडणूक प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेत आहे. मात्र उर्वरित 20 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने त्याबाबत काय निर्णय घेतला जाणार, यावर अद्याप स्पष्टता नाही. या पार्श्वभूमीवर 12 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका पुढे ढकलण्यास परवानगी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाची मागणी मान्य करत न्यायालयाने निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यानुसार, 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत
लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. १२ जिल्हा परिषदेचे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत आहे, त्यामुळे निवडणुका घेण्यात येणार आहेत. उर्वरित २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत.
ओबीसी आरक्षणासंदर्भात आणि बांठिया आयोगाच्या अहवालाच्या वैधतेबाबत 21 जानेवारी 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक सुनावणी होणार आहे. या सुनावणीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा आणि सभापती पदांचे आरक्षण यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुका आणि नियुक्त्या न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहतील.


