राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याचं बारामतीमध्ये विमान अपघातात निधान झाले. दादा माणूस गेल्यानंतर महाराष्ट्र सून्न झाला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. अजित पवारांच्या अकाली निधनाने बारामतीसह राज्याला धक्का बसलाय. मुंबईतून अजित पवार यांनी सकाळी ८.१० वाजता प्रस्थान केले. पण विमानात बसण्यापूर्वी अजित पवार यांनी शेवटचा फोन भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना केला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा शेवटचा फोन असल्याचं म्हटलं जातंय. बारामतीमध्ये विमान लँड झाल्यानंतर अजित पवार यांचं राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासोबत बोलणं होणार होतं. पण त्याआधीच काळाने घाला घातला. विमान लँड होण्याआधीच कोसळलं अन् अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. राणाजगजीतसिंह पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये काय बोलणं झालं? याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या आत्या आहेत. राणाजगजीतसिंह पाटील हे कुटुंबासह धाराशिवमधून बारामतीकडे रवाना झाले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राणाजगजीतसिंह पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवस असल्याचे त्यांनी म्हटलेय. काका म्हणून नव्हे तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे, धीर देणारे व्यक्तिमत्व आपल्यातून गेलेय. ही जाणीव मन पोखरणारी असल्याचे राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले.
मन अक्षरशः सुन्न आहे.अ पघात होण्याच्या काही वेळ आधीच त्यांच्याशी फोनवर संवाद झाला होता. नेहमीप्रमाणे आपुलकीने बोलणारा तो आवाज अजूनही कानात घुमतो आहे. आणि अवघ्या अर्ध्या तासात ही दुर्दैवी बातमी समजली त्या क्षणी काय वाटलं, ते शब्दांत मांडणं खूप कठीण आहे, असेही ते म्हणाले
राणाजगजीतसिंह पाटील यांची पोस्ट –
आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवसांपैकी एक आहे.काका म्हणून नाही तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे, धीर देणारे आणि कठीण प्रसंगी खंबीरपणे उभं राहायला शिकवणारे आज आपल्यातून निघून गेले आहे, ही जाणीव अक्षरशः मन पोखरून टाकणारी आहे. लहानपणापासून राजकारण, समाजकारण आणि जबाबदारी यांचा खरा अर्थ त्यांनी कृतीतून शिकवला. शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणं, निर्णय घेताना लोकहित डोळ्यांसमोर ठेवणं हे सगळं त्यांच्या सहवासातून नेहमीच शिकायला मिळालं.व्यक्तिगत नात्यातील मायेपलीकडे,ते माझ्यासाठी कायम एक आदर्श आणि प्रेरणास्थान राहिले.
क्षणार्धात आयुष्य कसं संपून जातं, याची ही भीषण जाणीव प्रचंड त्रासदायक आहे. व्यक्तिगत नात्याच्या पलीकडे, माझ्यासाठी ते कायम मार्गदर्शक आणि एक भक्कम आधार होते. त्या शेवटच्या संवादाची आठवण मनात प्रचंड भावनिक कोलाहल निर्माण करीत आहे, अजूनही विश्वास बसत नाही, अजितकाका सोडून गेले हे स्वीकार करणं अजूनही शक्य होत नाही.
या घटनेने केवळ आमच्या कुटुंबाचं नाही, तर संपूर्ण राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. कृतिशील, अनुभवी, लोकहितासाठी झटणाऱ्या नेतृत्वापासून वंचित झाल्याची जाणीव अधिक तीव्र होत आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांशी एकरूप होऊन काम करणारा नेता हरपल्याचं दुःख राज्याला दीर्घकाळ जाणवत राहील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणं कठीण आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना.


