लंके, झावरे, चौधरी यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा
लोकसभा निवडणुकीनंतरच्या वादाचे प्रकरण
अहिल्यानगर : प्रतिनिधी
अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाच्या निकालानंतर उफाळलेल्या राजकीय वैमनस्यातून उभ्या राहिलेल्या एका गंभीर व बहुचर्चित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत निर्णय दिला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात अॅड. राहुल झावरे, खासदार नीलेश लंके यांचे बंधू दिपक लंके व संदीप चौधरी यांना अटक न करण्याचे अंतरिम संरक्षण सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले.
अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे उमेदवार नीलेश लंके यांनी भाजपचे सुजय विखे यांचा पराभव करत पहिल्यांदाच खासदारकी मिळवली. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच, ६ जून २०२४ रोजी पारनेर येथील आंबेडकर चौकात अॅड. राहुल झवरे यांना अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होऊन त्यांना अहिल्यानगर येथील सुरभी हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचा जबाब नोंदवून पारनेर पोलीस ठाण्यात माजी नगराध्यक्ष विजय औटी, प्रितेश पनमंद यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात पाच आरोपींना अटक झाली असून बारा आरोपी फरार आहेत. तपास पूर्ण होऊन हे प्रकरण सध्या अहिल्यानगर सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हर्षदा पनमंद यांनी ७ जून २०२४ रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रार दाखल केली. या तक्रारीत जातिवाचक शिवीगाळ, विनयभंग, मारहाण व धमकीचे गंभीर आरोप करण्यात आले आणि त्यावरून २४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
अहिल्यानगर सत्र न्यायालयाने २१ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला; मात्र अॅड. राहुल झावरे, दिपक लंके व संदीप चौधरी यांचा जामीन नामंजूर झाला. त्यानंतर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपीलवर दीर्घकाळ अंतरिम संरक्षण मिळाले; परंतु २२ जानेवारी २०२६ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
अखेर या तिघांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली. २ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावत अटक न करण्याचे अंतरिम संरक्षण दिले. विशेष म्हणजे, पहिल्या फिर्यादीच्या वतीने ॲड. एस नागुमंथू, ॲड. संजय खराडे, ॲड.सुनीलकुमार वर्मा या ज्येष्ठ वकिलांची उपस्थिती ही बाबही चर्चेचा विषय ठरली.
या प्रकरणात बचाव पक्षाच्या वतीने ॲड. गौरव अग्रवाल, ॲड. रवी अडसुरे, ॲड. राहुल करपे, ॲड. यश सोनवणे, ॲड. राहुल जोंधळे, ॲड. विश्वभारती देवखिळे यांनी प्रभावी युक्तिवाद मांडत न्यायालयाचे लक्ष वास्तव परिस्थितीकडे वेधले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ मार्च रोजी होणार आहे


