अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा सध्या कुटुंब कीर्रतन या नाटकामुळे चर्चेत आहे त्याबरोबरच ‘आम्ही सारे खवय्ये’ कार्यक्रमातून संकर्षण प्रेक्षकांच्या भेटीला येतो. तो या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आहे. त्यामध्ये मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार हजेरी लावतात. खास पदार्थ बनवतात.
संकर्षणने एक खास रेसिपी सांगत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. संकर्षण म्हणाला, “आता उन्हाळा सुरू होणार आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला अनेकदा असे वाटते की, अंगात गरम वाटतंय, पोटात आग पडली आहे. जागरणानंतर तसेच आपण खूप तिखट, तेलकट खाल्लं, आपण प्रवासात असू, तर असं वाटतं की, आपल्या पोटात आग पडली आहे, हातापायांची आग होतेय असं अनेकदा वाटतं. अशा वेळेसाठी मी स्वत:करिता एक नामी उपाय शोधून काढला आहे. हा वैद्यकीय सल्ला अजिबात नाही. रेसिपी सांगत म्हणाला, “थोडंसं थंडगार दूध घ्यायचं. तापवून गार केलेलं किंवा न तापवलेलंसुद्धा चालेल. त्यामध्ये एक चमचाभर प्रवाळयुक्त गुलकंद घालायचा. पोट शांत राहण्यासाठी हा गुलकंद फार महत्वाचा असतो. माझी आजी आम्हाला सांगायची, आई-बाबा सांगतात आणि आता एक महत्वाचा पदार्थ व्हॅनिला आइस्क्रीम आहे.”
“१० रुपयांची व्हॅनिला आइस्क्रीमची डबी मिळते, ती आणायची. ते आइस्क्रीम आधीच्या मिश्रणात घालायचे. हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात फिरवायचं. मिक्सरमध्ये फिरवून घेतलं की, ते तुम्ही पिऊ शकता. रात्री तुम्ही न जेवता इतकं जरी पिऊन झोपलात, तर तुमच्या पोटात आग पडणार नाही”, असे सांगून, पुढे तो गमतीत असेही म्हणाला की, राहिलेला गुलकंद चमचानं खा.


