मुंबई येथे मंत्रालयाच्या इमारतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी धाड टाकत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला 50 हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. या घटनेमुळे मंत्रालयात खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यावर आता काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत खळबळजनक दावा केला आहे. ही कारवाई भाजपचे हे षड्यंत्र असू शकते, याद्वारे मंत्री नरहरी झिरवाळ यांना बदनाम करण्याचा डाव असू शकतो असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.
परवाना नूतनीकरणाच्या कामासाठी मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील काही पैसे स्वीकारताना या लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यावर बोलताना यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, ‘हे टक्केवारीचे सरकार आहे तर नरहरी झिळवाळ यांना बदनाम करण्याचे भाजपच षडयंत्र असू शकतं.’
ठाकूर म्हणाल्या की, आता मंत्रालयामध्ये याच गोष्टी चालू आहे. कुठल्याही ऑफिसमध्ये जा टक्केवारी टक्केवारीचा हिशोब आहे. आता ते उघड झालं आहे. प्रत्येक मंत्र्याच्या ऑफिसमध्ये टक्केवारी मागितली जाते. हे टक्केवारीचे सरकार हे आहे अशी टीकाही यावेळी ठाकूर यांनी सरकारवर केली आहे


