अहिल्यानगर -वांबोरी घाटातील डोंगरगण गावच्या शिवारात दरीमध्ये प्लास्टिकच्या गोणीत आढळून आलेल्या तरूणाच्या मृतदेहाची ओळख पटली असून किरण शिवाजी कवाणे (वय 32, रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी) असे त्याचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, नात्यातील व्यक्तींनीच त्याचा खून करून मृतदेह गोणीत टाकून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वांबोरी घाटात फेकल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
17 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास वांबोरी घाटात दरीमध्ये एका प्लास्टिकच्या गोणीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालात संबंधित तरूणाचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी मृतदेहाचे वर्णन जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पाठविले तसेच सोशल मीडियावरही प्रसारित केले.मृतदेहाच्या उजव्या हाताच्या मनगटावर ‘छत्रपती’ असे गोंदलेले (टॅटू) आणि छातीवर ‘सोनाली’ असे नाव गोंदलेले असल्याची माहिती देण्यात आली होती. ही माहिती सोशल मीडियावर पाहिल्यानंतर किरण कवाणे याच्या एका मित्राने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी टाकळीमियाँ येथे जाऊन नातेवाईकांना मृतदेहाचे छायाचित्र दाखविले असता त्यांनी ओळख पटवली. पुढे बुधवारी (18 फेब्रुवारी) रोजी सायंकाळी नातेवाईकांना नगर येथील जिल्हा रूग्णालयात नेऊन मृतदेह दाखविण्यात आला. तेथेही त्यांनी हा मृतदेह किरण कवाणे याचाच असल्याचे निश्चित केले. आवश्यक कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी रात्री त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.तपासादरम्यान किरण कवाणे याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानुसार किरणच्या नात्यातील दोन व्यक्तींना गुरूवारी (19 फेब्रुवारी) चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. प्राथमिक माहितीनुसार संबंधितांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. किरणचा खून नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, त्यामागे कौटुंबिक वाद की अन्य काही कारण आहे का, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच खून केल्यानंतर मृतदेह कोणत्या वाहनातून वांबोरी घाटात नेऊन फेकण्यात आला, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर उलगडा लवकरच होण्याची शक्यता असून पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


