अहिल्यानगर मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी सुभाष लोंढे बिनविरोध
महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी दिपाली बारस्कर, उपसभापतीपदी वर्षा सानप यांची निवड
महापौर ज्योतीताई गाडे यांच्या हस्ते सत्कार; शहर विकासासाठी काम करण्याची ग्वाही
अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिका स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदांची निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी आनंद भंडारी (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक सुभाष लोंढे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका दिपाली बारस्कर तर उपसभापती पदासाठी भाजपच्या नगरसेविका वर्षा सानप यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी महापौर ज्योतीताई गाडे आणि उपमहापौर धनंजय जाधव यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. कार्यक्रमास आयुक्त यशवंत डांगे, नगरसचिव मेहेर लहरे, सदस्य बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, मनोज कोतकर, निखिल वारे, सुरेश बनसोडे, मनोज दुल्हम, संध्या पवार, वंदना ताठे, गौरी बोरकर, , मीनाताई चोपडा, पूर्णिमा गव्हाळे, सोनाबाई शिंदे, नवनाथ कातोरे, सुनिता भिंगारदिवे, अनिता शेटीया, काजल भोसले, सुनिता कांबळे, अश्विनी लोंढे, शीतल ढोणे, पुष्पाताई बोरुडे, आशाबाई कातोरे, रोशनी त्रिंबके, प्रकाश भागानगरे, महेश तवले, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर, रोहन सानप, महेश लोंढे, सतीश शिंदे, सतीश बारस्कर आदी सदस्य उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना स्थायी समितीचे नूतन सभापती सुभाष लोंढे यांनी सांगितले की, प्रशासनाच्या काळात शहरातील घरांचे सर्वेक्षण तसेच पाणीपट्टी वाढीबाबत पुनर्विचार केला जाईल. प्रलंबित प्रश्न जलद गतीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. शहरातील काही भागांमध्ये असलेल्या पाणीप्रश्नावर लक्ष देऊन नागरिकांना मुबलक व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. स्थायी समिती सदस्यांना सोबत घेऊन शहर विकासाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी काम केले जाईल. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.
महिला व बालकल्याण समितीच्या नूतन सभापती दिपाली बारस्कर म्हणाल्या की, शहरातील महिलांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे यासाठी योगा क्लास सुरू केले जातील. महिलांच्या सुरक्षेसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले जाईल तसेच शहरात विविध ठिकाणी हिरकणी कक्ष सुरू करण्याचा मानस आहे. महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांची उभारणी तसेच महापालिकेच्या मोकळ्या जागांवर सुसज्ज अंगणवाडी इमारती उभारण्याचे नियोजन करण्यात येईल. महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकासकामे राबविली जातील. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून समितीसाठी निधी उपलब्ध करून घेतला जाईल. मुलींच्या लसीकरणाबाबत शहरात जनजागृती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपसभापती वर्षा सानप यांनी सांगितले की, संत-महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी संस्कार शिबिरांचे आयोजन केले जाईल. तसेच महिलांचे आणि मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला बालकल्याण समिती कटिबद्ध राहील, असे त्यांनी सांगितले


