मैत्री म्हणजे जगातील सर्वात सुंदर आणि निस्वार्थ नातं. जेव्हा कोणी आपल्या आनंदात मनापासून आनंदी होते, आपल्याला हसताना पाहून हसते आणि आपल्या दुःखात साथ देते, संकटात खांद्याला खांदा लावून उभा राहते ती खरी मैत्री असते. मैत्री म्हणजे स्पर्धा नाही, तर एकमेकांना पुढे जाण्याची प्रेरणा देणे आणि यश मिळाल्यानंतर तितक्याच आनंदाने टाळ्या वाजवणे,कौतुक करणे, तसेच अपयश आल्यानंतर आधार देणे हीच खरी मैत्री असते.
मैत्री म्हणजे दिलेला शब्द पाळणं, स्वार्थ न ठेवता एकमेकांना कायम साथ देणे. कधी खांद्यावर हात ठेवून चालणं, तर कधी त्याच खांद्यावर बसवून त्याचा आनंद साजरा करणं—यालाच खरी मैत्री म्हणतात. अशाच एका सुंदर मैत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर सध्या कोल्हापुरातील दोन जिवलग मित्रांची मैत्री चांगलीच चर्चेत आली आहे. आपला मित्र भारतीय सैन्यात भरती झाल्यानंतर तरुणाला झालेला आनंद व्हिडीओमध्ये दिसत आहे. मित्राचे यश साजरा करण्यासाठी तरुणाने त्याला अक्षरशः खांद्यावर बसवून संपूर्ण गावात फिरवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.रोहित जोंधळे आणि संतोष माने हे कोल्हापुरातील दोन जिवलग मित्र. नुकतीच रोहितची १०९ इन्फंट्री TA मराठा बटालियनमध्ये भारतीय सैन्यात निवड झाली. रोहितच्या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र हा आनंद सर्वात जास्त कोणाला झाला असेल तर तो त्याचा मित्र संतोष माने यालाच. संतोषने काही वर्षांपूर्वी रोहितला एक शब्द दिला होता – “तू अंगावर वर्दी चढव, मी तुला खांद्यावर घेऊन अख्खा गाव फिरवीन.” रोहितची सैन्यात निवड झाली तेव्हा संतोषने दिलेला शब्द पाळला अन् रोहितला खांद्यावर बसवून आनंदाने गावात फिरवले. याच जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी या मैत्रीचे कौतुक करत आहेत.व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये संतोष माने हा रोहित जोंधळेला खांद्यावर उचलून गावातून फिरवत असल्याचे दिसते. गावकरी देखील या आनंदाच्या क्षणात सहभागी झाले होते. गुलाल उधळत ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषाच्या वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली. हा क्षण केवळ मित्राच्या यशाचा उत्सव नव्हता, तर देशसेवेसाठी सैन्यात जाणाऱ्या तरुणाबद्दल समाजात असलेला अभिमानही यातून दिसून येतो


