एसटी प्रवास महागला! १० टक्के भाडेवाढ; उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तिकीट दर वाढणार

 राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या काळात महसूल वाढीच्या उद्देशाने उन्हाळी सुट्टीत एसटीच्या तिकीट दरात १० टक्क्यांनी भाडेवाढ केली आहे. एसटीचा प्रवास महाग झाल्याने प्रवाशांना तिकिटासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.

राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) उन्हाळी गर्दीच्या हंगामात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘परिवर्तनशील भाडे’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या हंगामात १० टक्के प्रवासी तिकीट दरवाढ केली आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यात प्रवाशांना १२ रुपये मोजावे लागतील. ही भाडेवाढ १५ एप्रिल २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधीत लागू राहणार असून, या कालावधीत साध्या बससाठी प्रवाशांना वाढीव भाडे मोजावे लागणार आहे.

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या काळात बसवर अतिरिक्त ताण येतो. या पार्श्वभूमीवर महसूल वाढवणे आणि सेवा सुरळीत ठेवणे यासाठी परिवर्तनशील भाडे लागू केले आहे. या योजनेअंतर्गत, बसची मागणी आणि मार्गानुसार भाड्यात वाढ केली जाणार आहे. या भाडेवाढीतून मासिक, त्रैमासिक व विद्यार्थी पासधारकांना वगळण्यात आले आहे. तसेच, काही विशेष योजना व सवलती यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

एसटीने सर्व आगार आणि विभागीय अधिकाऱ्यांना या भाडेवाढीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, ईटीएम आणि ओआरएस प्रणालीद्वारे सुधारित भाडे आकारणी केली जाणार आहे. ज्या मार्गावर निश्चित भाडे पद्धती लागू आहे. त्या ठिकाणीही आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. इंधन दरवाढ, देखभाल खर्च आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे काही प्रवाशांनी मान्य केले आहे. तरी सर्वसामान्य नागरिकांवर त्याचा आर्थिक ताण वाढणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

यात्रा, सणासुदीचा काळ, सुट्ट्या, सप्ताह अखेर, गर्दीचा कालावधी यादरम्यान राज्य परिवहन प्राधिकरणाने ३० टक्क्यापर्यंत भाडेवाढ करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी (२०२६) साध्या बसच्या प्रवास भाडेदरास मंजुरी दिली आहे. उन्हाळी गर्दीचा हंगाम कालावधी १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत साध्या बससाठी हे दर लागू राहणार आहेत. साधी बस वगळता निमआराम, विनावातानुकूलित शयन आसनी, विना वातानुकूलित शयनयान, शिवशाही (वातानुकूलित), जनशिवनेरी (वातानुकूलित), शिवनेरी (वातानुकूलित), ९ मीटर ई-बस (वातानुकूलित), १२ मीटर ई-बस/ई-शिवाई, या बससेवा प्रकारातील बस भाड्यात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही. भाडे दरवाढीचे परिपत्रक कुसेकर यांनी प्रसिद्ध केले आहे. या अतिरिक्त उत्पन्नातून बससेवा अधिक सक्षम आणि वेळेवर करण्यावर भर दिला जाईल, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles