महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. या 9 जागांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या आमदार नीलम गोऱ्हे यांचा देखील कार्यकाळ संपत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुन्हा शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार याबाबत चर्चा सुरु आहे. अशातच शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहलं आहे. यामध्ये
उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी न देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काहीही केलं नाही, उलट महिलांचे खच्चीकरण केलं
पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हे यांनी काही केले नसून उलट महिलांचे खच्चीकरण होईल यावर त्यांनी भर दिल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. महिलांचे चरित्र हनन करुन त्यांच्यात भांडणे लावून संघटनेचे मोठे नुकसान केले आहे. नीलम गोऱ्हे या सर्वांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा आमदार करणार असल्याचा शब्द दिला असल्याचे सांगत आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या ऐवजी सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली तर कार्यकर्ता तुम्हाला सलाम करेल असे या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. अन्यथा उध्दव ठाकरे यांच्याप्रमाणे तुम्हाला पुन्हा एकदा बाईने फसवले असे पत्रात म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात तारीख व कुणाचे नाव नसून पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी या नावाने पत्र देण्यात आलं आहे.


