स्वगणना करीत पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अहिल्यानगर जिल्हा जनगणनेचा शुभारंभ
अहिल्यानगर, दि. १ :- राष्ट्रीय जनगणनेला आजपासून महाराष्ट्रात सुरुवात झाली असून जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वगणना करीत अहिल्यानगर जिल्ह्यातील जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
पोलीस कवायत मैदान येथे १ मे महाराष्ट दिनाच्या व कामगार दिनाच्या शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर स्वगणनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी टॅबवर स्वतःच्या घरगणनेसंबंधी असणाऱ्या सर्व ३४ प्रश्नांची उत्तरे भरली. स्वतःच्या घराची माहिती भरून ‘सबमिट’ बटनावर क्लिक केल्यावर त्यांचा ‘सेल्फ एन्युमरेशन आयडी’ तयार झाला. अशा पद्धतीने स्वतःच स्वतःची माहिती भरून पालकमंत्री महोदयांनी जिल्ह्यातील जनतेला स्वगणना करण्याचे आवाहन देखील केले.
दिनांक १ ते १५ मे हा स्वगणनेचा कालावधी असून त्यानंतर १६ मे ते १४ जून या कालावधीत घरोघरी जाऊन प्रगणकांमार्फत जनगणना केली जाणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते व इतर अधिकाऱ्यांनीही आपली स्वगणना पूर्ण केली. तसेच, या जनगणना मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.


