पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय मिळवत ममता बॅनर्जी यांना सत्तेतून पायउतार केले. या निवडणुकीत एका अशा महिलेने इतिहास रचला आहे, . ज्या हातांनी कालपर्यंत दुसऱ्याच्या घरात झाडू-पोछा केला, त्याच हातांनी आता बंगालच्या विधानसभेत लोकशाहीची लेखणी चालणार आहे. औशग्राम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार कल्पिता माझी यांनी विजय मिळवला.
कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या चार घरांमध्ये धुणी-भांडी आणि झाडू-लादी करायच्या. महिन्याकाठी मिळणाऱ्या अवघ्या २५०० रुपयांत त्या आपल्या संसाराचा गाडा ओढत होत्या. पती ड्राय क्लीनरचे काम करायचा. पण गरिबीने कधीही त्यांच्या स्वाभिमानाला हरवले नाही. कल्पिता माझी यांनी घराघरात जाऊन जसा कचरा साफ केला, तसाच आता राजकारणातील कचरा साफ करण्याची जिद्द घेऊन त्या मैदानात उतरल्या.
कल्पिता माझी यांची ही जिद्द आजची नाही. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी नशीब आजमावले होते, पण तेव्हा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पराभवानंतर त्या पुन्हा आपल्या कामात मग्न झाल्या, पण लोकांच्या संपर्कात राहिल्या. पक्षाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि यावेळेस त्यांनी १२,५३५ मतांच्या फरकाने श्यामा प्रसन्ना लोहार यांचा पराभव केला. कल्पिता यांना एकूण १,०७,६९२ मते मिळाली. या विजयाने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे


