इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दोन उच्चस्तरिय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला आणि त्यानुसार काही निर्णय जाहीर केले. या बैठकांना मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कोणकोणते निर्णय?
– मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्यात यावी. बाहेरच्या प्रवासात असताना ताफ्यातील वाहनांची संख्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसेल याची जबाबदारी संबंधित पोलिस आयुक्त किंवा पोलिस अधीक्षक यांची असेल.-
मंत्री-अधिकार्यांनी कोणतेही विदेश दौरे करु नयेत.
– मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करु नये, त्याऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करावा.
* मंत्री-अधिकारी यांनी आवर्जून मेट्रो आदी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस असा प्रयोग करावा.
* अधिकार्यांना बैठकांना बोलावण्याऐवजी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घ्याव्यात.
* शासनात वितरित करण्यात आलेल्या वाहनांचा कोटेकोरपणे आढावा घेण्यात यावा.
* ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्ज/फ्लेक्सवरील कारवाई वाढवण्यात याव्यात आणि तेथे डेकोरेटिव्ह लायटिंगचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी
मुंबईत असताना फडणवीस यांनी यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मोदी यांनी जनतेला केलेल्या आवाहनावर भूमिका व्यक्त केली. विरोधक मोदी यांनी केलेल्या आवाहनाला विरोध करत आहेत. या आवाहनाला प्रतिसाद द्यायचा नसेल तर निदान निंदा करू नये, असे फडणवीस म्हणाले. तसेच देशासमोर संकट निर्माण होऊ नये म्हणून पंतप्रधान काही उपाय सुचवत असतील तर विरोधकांना त्याची अंमलबजावणी नसेल करता येत तर त्या उपायांची थट्टा मस्करी करु नका, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.


