पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच संपूर्ण देशवासीयांना पेट्रोल-डिझेल आणि परकीय चलन वाचवण्यासाठी ‘काटकसर’ करण्याचं आवाहन केलं. पंतप्रधानांनी कार्यक्रमात बोलताना पेट्रोल आणि डिझेलचा वापर मर्यादित ठेवण्यासह पुढील एक वर्ष सोनं खरेदी टाळण्याचा सल्लाही दिला आहे. तसंच परदेश दौरे टाळा असंही त्यांनी सांगितलं. मोदींच्या या आवाहनावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
लोकप्रिय अभिनेते विद्याधर जोशींनी फेसबुक पोस्ट शेअर करत मोदींच्या आवाहनानंतर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कलाक्षेत्रात कार्यरत असल्याने वर्क फ्रॉम शक्य नाही, रोजच्या वापरात तेलाचं प्रमाण कमीच असतं, सोनं खरेदी करण्याचा विचार मनात येणं म्हणजे मोठा विनोद त्यामुळे आता ‘अजून काय करू’ असा सवाल विद्याधर जोशींनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे.
काल फार Disturbed होतो… काय करावं सुचत नाही…
गेल्या सात-एक वर्षात मी परदेश प्रवास केलेला नाही… आताचे तिकिटांचे दर आणि एकूण पाहता पुढे २-४ वर्षही जाता येणार नाही.. आपल्या देशात दोन वर्षांत एखादी ट्रिप होते.. पण विमानाचं तिकीट लवकर आणि स्वस्त असेल तेव्हा काढतो… आता महिन्याभरापूर्वी हिमालयात गेलो होतो पण तेव्हा मोदी सर काटकसरीच बोलले नव्हते…Work From Home माझ्या बाबतीत शक्य नाही. (आरशात बघून Acting करावी लागेल)…पब्लिक Transport एकदा मोदी सर मुंबईत येऊन स्वतः वापरून बघतील तेव्हा त्यांना गंमत कळेल…( बरं आमची Work Place असते मढ, घोडबंदर रोड, मिरारोड.. तिथे पोहोचेपर्यंत माझं वय वाढेल.)
आता तेलाचं म्हणाल तर आमच्या घरी ‘तळणं ‘ कमीच असत… माझी शेती नाही…ऑरगॅनिक पटकन मिळत नाही… मिळालं तरी परवडेल असे भाव नसतात… सोन विकत घ्यावं हा विचार मनात येणं म्हणजे मोठ्ठा विनोद…! स्वदेशीबद्दल बोलून उपयोग नाही… साधं चिनी वापरायचं नाही, असं ठरवलं तरी शक्य नाही हे मोदी सरही मान्य करतील!!!… घरात वीजही जपून वापरतो.
करू काय आता????
( त्यातल्या त्यात मुंबईत इमारती म्हणा किंवा एकूणच जो विकास झालाय त्याने उष्णता इतकी वाढली आहे की गच्चीवर तवा ठेवून पोळ्या भाजता येतात का ते बघावं म्हणतो!! )


