श्रीगोंदा -तालुक्यातील काष्टीसह इतर भागात शाखा आणि उपशाखा असलेल्या साईसेवा पतसंस्था आणि मल्टीस्टेटच्या ठेवी गुंतवणूकदारांना मिळत नसल्याने प्रशासकीय पातळीवर ठोस निर्णय होत नव्हता. सहा महिने संचालक मंडळाने वेगवेगळे आश्वासन देऊन वेळ मारून नेला, मात्र आता संस्थेचा अध्यक्ष परागंदा झाला असून बहुतांश संचालक फरार आहेत. त्यांचे मोबाईल नॉटरिचेबल आहेत. यातच काही ठेवीदाराच्या अर्जावर श्रीगोंदा न्यायालयाने या संस्थेच्या पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यात सिस्पे तसेच समर्थ क्रॉप या कंपन्यांनी हजारो कोटी रुपयाचा गंडा गुंतवणूकदारांना घातला त्याच पावलावर पाऊल टाकत सहकार क्षेत्रात राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त साईसेवा पतसंस्थेचा अध्यक्ष, संचालक तसेच व्यवस्थापक यांनी संगनमतानेे ठेवीदारांचे पैसे आपल्या व्यवसाय, जमीन खरेदी, प्लॉट खरेदी, स्वीट कंपनी आणि राज्यातील प्रसिद्ध कथाकाराच्या कार्यक्रमाचे इव्हेंट आणि त्यांना आलिशान गाड्या देण्यासाठी केला असल्याचा आरोप ठेवीदार कृती समितीने केला आहे.
मागील एक वर्षापासून ठेवीदारांना पैसे परत मिळत नाहीत. या दरम्यान अध्यक्ष आणि व्यवस्थापक वेगवेगळी आश्वासन देत होते, मात्र पैसे देण्याचे टाळत होते. दरम्यान, ठेवीदार कृती समितीने पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. मात्र सहकार विभाग ठोस पावले उचलत नाहीत. संस्थेचे लेखापरीक्षण यातही वेळकाढूपणा सुरू आहे. या सर्व प्रकारात ठेवीदार आक्रमक होत आहेत. काही ठेवीदार यांच्या श्रीगोंदा येथील न्यायालयीन दाव्यात ठेवीदारांचा पतसंस्था आणि मल्टीस्टेट दोन्हीचे संचालक चेअरमन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत. आता अध्यक्ष आणि बहुतांश संचालक फरार झाले आहेत. त्यांचे फोन नॉट रिचेबल आहेत.


