फडणवीसांनीच आरक्षण दिले, तेच टिकवणार; विखे यांचा जरांगेंना सल्ला

मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत. मुख्यमंत्र्यांवर टीका करून मनोज जरांगे आपला स्वतःचा जनाधार कमी करत आहेत, असा पलटवार मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारकडून सकारात्मक कार्यवाही सुरू आहे. उद्या, शुक्रवारी जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती करणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

लोणी येथे आज, गुरूवारी माध्यमांशी बोलताना विखे म्हणाले, मुख्यमंत्री मागण्यांवर अतिशय सकारात्मक असताना फक्त त्यांनाच केंद्रबिंदू करून श वैयक्तिक टीका करणे योग्य नाही. एका व्यक्तीवर टीका करून प्रश्न सुटणार नाही. जरांगे पाटलांच्या लढ्याबद्दल आदरच आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांवर टीका करून ते आपला स्वतःचा जनाधार कमी करत आहेत. मराठा समाजाला यापूर्वी दिलेल्या आरक्षणाचे सर्व श्रेय देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. त्यामुळे जरांगे पाटलांचे जे काही गैरसमज झाले आहेत, ते प्रत्यक्ष भेटीत दूर करणार असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले.

सन २०१४ ते २०१९ या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले होते. समाजाच्या भावना लक्षात घेऊन सरकारने कार्यवाही केली, परंतु मधल्या काळात दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकारला आरक्षण टिकवता आले नाही. पुन्हा महायुती सरकार सत्तेवर आल्याने प्रयत्न सुरू झाले असून, जरांगे पाटलांच्या मागणीनुसार सरकारने हैदराबाद गॅझेटही जाहीर केल्याकडे विखे यांनी लक्ष वेधले.

कायद्याच्या चौकटीत राहूनच आरक्षणाचा निर्णय करावा लागणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीच समाजाला आरक्षण दिले आणि आताही तेच देणार आहेत. त्यांच्यामुळेच आरक्षणाच्या मागणीवर मार्ग निघत आहे. उपोषण हा काही एकमेव मार्ग नसून, जरांगे पाटलांच्या बहुतांशी मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत, तर अन्य मागण्यांवर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

उपसमितीचा अध्यक्ष म्हणून जी कार्यवाही केली, त्याची वेळोवेळी कल्पना जरांगे पालकांना दिली आहे. त्यांनी आणखी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्या विषयांवर उद्या त्यांना समक्ष भेटून चर्चा करणार आहे. जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर केलेला आरोप केवळ गैरसमजुतीतून आहे. आरक्षण देण्याचे आणि सर्वोच्च न्यायालयात ते टिकवण्याचे काम फडणवीस यांनीच केले, हे सर्वश्रुत आहे. उपसमितीचा अध्यक्ष म्हणून मी जे निर्णय घेतले, ते मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातूनच झाले आहेत. जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा हे समजून घ्यावे की, सरकार म्हणून आम्ही एकत्रित कार्यवाही करत आहोत; त्यांच्या नेतृत्वाखालीच महायुती सरकार काम करीत असल्याचे विखे यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles