आयपीएल 2026 मधील आपल्या स्फोटक कामगिरीने क्रिकेटविश्वाला थक्क करणाऱ्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीबाबत आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संपूर्ण स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजी करत वैभवने भारतीय संघातील भविष्यासंदर्भातील चर्चांना अधिकच वेग दिला आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या बिहारच्या या युवा फलंदाजाने आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक 776 धावा करत ऑरेंज कॅप पटकावली. तब्बल 237.30 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत त्याने संपूर्ण हंगामात गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.आयपीएल 2026 च्या समारोपानंतर बीसीसीआय सचिव देवाजीत सैकिया यांनी वैभवचे भरभरून कौतुक केले. त्याच्या भविष्यासंदर्भात बोलताना त्यांनी सकारात्मक संकेत दिले. सैकिया म्हणाले, “हा आयपीएल हंगाम अतिशय शानदार ठरला. सर्व चाहत्यांनी या स्पर्धेचा आनंद घेतला असेल, अशी मला आशा आहे. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाचे अभिनंदन. वैभव सूर्यवंशी हा अत्यंत प्रतिभावान आणि उदयोन्मुख खेळाडू आहे. त्याचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. क्रिकेटच्या सर्वोच्च स्तरापर्यंत त्याला पोहोचवण्यासाठी बीसीसीआय सर्वतोपरी प्रयत्न करेल.” सैकियांच्या या वक्तव्याकडे वैभववरील मोठा विश्वास म्हणून पाहिले जात आहे.वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या इतिहासात नवा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. अवघ्या 15 वर्षे आणि 65 दिवसांच्या वयात ऑरेंज कॅप जिंकणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला. यापूर्वी हा विक्रम साई सुदर्शनच्या नावावर होता. त्याने 2025 मध्ये 23 वर्षे 231 दिवसांच्या वयात ऑरेंज कॅप जिंकली होती. तसेच शुभमन गिलने युवा वयात ही कामगिरी केली होती.
आयपीएल 2026 मध्ये ऑरेंज कॅप, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरसह अनेक वैयक्तिक पुरस्कार जिंकणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आपण केवळ भविष्याचा नव्हे तर भारतीय क्रिकेटच्या वर्तमानातीलही मोठा स्टार असल्याचे सिद्ध केले आहे. आता बीसीसआय सचिवांच्या वक्तव्यानंतर एकच प्रश्न क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चिला जात आहे, वैभव सूर्यवंशीला लवकरच टीम इंडियाच्या निळ्या जर्सीत पाहायला मिळणार का? त्याचे उत्तर येणाऱ्या काळात मिळेल, पण या युवा फलंदाजाने भारतीय संघाचे दार जोरदार ठोठावल्याचे निश्चित आहे.


