विधान परिषद निवडणुकांमुळे सांगलीमधील राजकारण तापलं असतानाच एक मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे. सांगलीत भाजपनं मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सांगलीत धोबीपछाड करत मोठा धक्का दिला आहे.भाजपनं अजित पवार गटाचे माजी खासदाराला आपल्या गळाला लावले असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
सांगलीचे माजी खासदार संजय पाटील यांची अखेर घरवापसी होणार आहे.. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात असणारे माजी खासदार संजयकाका पाटील आता पुन्हा भाजपात परतणार आहेत. मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 30 जून रोजी संजयकाका पाटील यांचा भाजपात प्रवेश होणार असल्याची माहिती पाटील यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपाशी वाढलेली संजयकाकांची जवळीक यामुळे संजयकाका भाजपा परतणार,अशी चर्चा सुरू होती. मात्र पक्षांतर्गत असणाऱ्या विरोधामुळे ग्रीन सिग्नल मिळत नव्हता, दोन दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची संजयकाका पाटील यांनी विटा येथे भेट घेत चर्चा केली होती. भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून आता संजयकाका पाटील हे पुन्हा भाजपात परतणार आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील भाजपची ताकद आणखी वाढणार असून सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीमध्ये देखील भाजपाला याचा फायदा होणार आहे.
२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्याच वर्षी नोव्हेंबरमधील विधानसभा निवडणुकादरम्यान संजय पाटील हे राष्ट्रवादीत गेले होते. अजित पवार गटाकडून त्यांनी तासगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र तेथेही त्यांना पराभव पत्करावा लागला. आमदार रोहित पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर मात्र ते काही राष्ट्रवादीत रमले नाहीत. ते भाजप प्रवेशासाठी धडपडताना दिसले.
यानंतर त्यांनी तासगाव नगरपालिका तसेच तासगाव पंचायत समितीमध्ये सत्ता आणून त्यांनी पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर त्यांचे भाजपशी जवळीक पुन्हा वाढली. मग त्याचवेळी माजी खासदार संजय पाटील पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक होते. मात्र त्यांचा प्रवेश लांबला होता. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अध्यक्ष निवडी वेळीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार भाजपला साथ दिली. दरम्यान, सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शनिवारी कराड येथे आले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि भाजप प्रवेशाचा मुर्हूत ठरला.


