महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या ‘ऑपरेशन टायगर’ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील खासदार फुटीच्या चर्चांनी चांगलंच वादळ निर्माण केलं आहे. ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदार फुटल्याची आणि त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी पत्र दिल्याचा खळबळजनक दावा केला जात आहे. या राजकीय भूकंपावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ऑपरेशन टायगरवर प्रश्न विचारताच अमृता फडणवीस यांनी केवळ एका वाक्यात हा विषय संपवला आहे.
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमात अमृता फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी पत्रकारांनी त्यांना ‘ऑपरेशन टायगर’बाबत प्रश्न विचारला असता अमृता फडणवीस म्हणाल्या की, “आज योग दिवस आहे. ऑपरेशन टायगर हा त्या दोन पक्षांमधला विषय आहे, आपण चांगल्या दिवशी फक्त योग या विषयावर बोललं पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.राजकीय विषयावर बोलणे टाळत अमृता फडणवीस यांनी योग दिनाच्या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या, “योग दिवसाच्या निमित्ताने आम्ही योग दिवस शेतकऱ्यांच्या मुलांसह आणि मुंबई महापालिकेतील शाळेतल्या मुलांसह सेलिब्रेट करतो आहोत. शेतकऱ्यांची जी मुलं मुंबईत आली आहेत त्यांना आम्ही मुंबईची सैरही घडवणार आहोत. आज रात्री जेवण झाल्यानंतर ते सगळे आपल्या आपल्या घरी जातील. रोज योग करा आणि निरोगी राहा असंच मी सांगेन.”
या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर, अभिनेत्री अनुप्रिया पटेल आणि राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक दिग्गज सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या मुलांसोबत योग करण्याचा विशेष आनंद मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले


