खासदार ओमराजे निंबाळकरांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशीवमधील राजकीय वातावरण तापलंय. ओमराजेंच्या पक्षांतराबाबत खुद्द त्यांच्या बंधूंनी मोठा गोप्यस्फोट केलाय. बंडाचं प्लॅनिंग कधी पासून सुरु होतं?ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले खासदार ओमराजे निंबाळकर शिंदे सेनेत गेल्यावर धाराशीवमध्ये राजकीय वातावरण तापलंय. कार्यकर्त्यांशी बोलूनच पक्षांतराचा निर्णय घेतला असं ओमराजेंनी दावा केला असला तरी त्यांचे चूलतबंधू मकरंदराजे निंबाळकरांनी मात्र त्यांच्याबाबत वेगळाच गौप्यस्फोट केलाय. खासदार ओमराजे निंबाळकरांचं बंडाचं प्लॅनिंग महिनाभरापासून सुरू होतं, असा मोठा दावा मकरंदराजे निंबाळकर यांनी केलाय.
धाराशिव हा ठाकरेसेनेचा बालेकिल्ला आहे. ओमराजेंच्या पक्षांतराच्या निर्णयामुळे निराश न होता आपला गड कायम राखण्यासाठी ठाकरेसेनेचे कार्यकर्ते कामाला लागलेत. खुद्द उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करतायेत. धाराशीवला 28 जूनला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेसेनेच्या गावोगावी बैठका सुरू आहेत.
भाजपचे आमदार राणाजगतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजेंनी पराभव केला होता. त्यांनी ओमराजेंचं महायुतीत स्वागत केलं असलं तरी विकास कामांवरुन टोला लगावलाय.
ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजे निंबाळकर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले. मात्र शिंदे सेनेत जाण्याचा त्यांचा निर्णय एका रात्रीत झाला नाही. महिनाभरापासून त्याची रणनिती आखली जात होती हे उघड झालंय. ठाकरेंचा गड असलेल्या धाराशिवमध्ये ठाकरेंना नवे निंबाळकर मिळालेले असले तरी तळागाळात संपर्क असलेल्या ओमराजेंना रोखण्यात ते यशस्वी होणार का? पक्ष संघटना नव्यानं मजबूत करण्यात यश येणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.


