करंजी घाटातील रस्ता मुसळधार पावसाने खचला; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे आदेश
पाथर्डी, 28 जून 2026: कल्याण–विशाखापट्टणम महामार्गावरील करंजी घाट परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आज खासदार निलेश लंके यांनी प्रत्यक्ष पाहणी करून NH PWD अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर दुरुस्तीचे आदेश देण्यात आले.
पावसाळ्याचे दिवस असल्याने घाटातील खचलेला भाग वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक झाला असून, येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांच्या व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन पाहणीदरम्यानच NH PWD चे उपअभियंता श्री. चेमटे साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला.
युद्धपातळीवर दुरुस्तीचे निर्देश
घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कोणतीही दिरंगाई न करता अत्यंत युद्धपातळीवर आणि त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी उपअभियंता श्री. चेमटे यांनी संबंधित कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती दिली. नियुक्त एजन्सीला तातडीने काम सुरू करून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
पावसाळ्यात घाट परिसरात प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी खबरदारी घ्यावी आणि खचलेल्या भागाजवळ सावकाश वाहने चालवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


