सीना नदीवरील पूल पावसाळ्यात बंद; पर्यायी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा – ॲड. युवराज शिंदे
अहिल्यानगर : कल्याण महामार्गावरील सीना नदीवरील पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असून अद्याप पूर्ण झालेले नाही. पावसाळ्यात सीना नदीला पूर आल्यानंतर हा पूल दोन-दोन दिवस वाहतुकीसाठी बंद राहतो. त्यामुळे कल्याण रोड परिसरातील नागरिकांची दळणवळणाच्या दृष्टीने मोठी गैरसोय होत असल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते ॲड. युवराज शिंदे यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या निदर्शनास आणून दिली.
याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात, कल्याण महामार्ग ते वारुळाचा मारुती रस्त्याला जोडणाऱ्या पर्यायी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून त्यावर मुरूम टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या हा रस्ता मातीचा असून पावसामुळे चिखल व पाणी साचत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा वाहने घसरून अपघात होण्याच्या घटनाही घडत आहेत.
मागील वर्षी पुराच्या पाण्यात एक व्यक्ती वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पर्यायी रस्ता तातडीने वाहतुकीयोग्य करणे आवश्यक असल्याचे ॲड. शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
येत्या आठ दिवसांत पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करून मुरूम टाकण्यात आला नाही, तर महापालिकेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ॲड. युवराज शिंदे यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.


