अहिल्यानगर -श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे पायी निघालेला श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पायी दिंडी सोहळा अहिल्यानगरमध्ये येत असल्याने, कृषी उत्पन्न बाजार समितीने मुख्य बाजार मार्केट यार्ड व नेप्ती उपबाजार दोन दिवस बंद ठेवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
हा पालखी सोहळा ११ जुलै व १२ जुलै या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी बाजार समितीच्या भुसार व भाजीपाला यार्डवर थांबणार आहे. या दिंडीमध्ये सुमारे ५० हजार वारकरी सहभागी असून, त्यांच्या जेवणाच्या व इतर नियोजनासाठी माथाडी कामगारांची आवश्यकता भासणार आहे.
याच पार्श्वभूमीवर १२ जुलै आणि १३ जुलै रोजी बाजार समितीचे नेप्ती उपबाजार दोन दिवसांकरिता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. १४ जुलै पासून नेप्ती उपबाजार पुन्हा नियमितपणे सुरू होईल, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी दिली आहे.


