धर्म बदलल्याने जात बदलत नाही
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला
“धर्म बदलल्याने जात बदलत नाही” याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. केवळ एखाद्या व्यक्तीने विशिष्ट धर्म स्वीकारला किंवा त्याचे पालन केले म्हणून जन्माने प्राप्त झालेली जात बदलत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. या निर्णयामुळे जातवैधता प्रमाणपत्राशी संबंधित अनेक प्रकरणांसाठीहा महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो.
अमरावती येथील प्राची सुधीर नेटके (वय २०) या अभियांत्रिकी विद्यार्थिनीने ‘वाणी’ या इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, तिच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात जात ‘सैतवाल जैन’ अशी नोंद असल्याचे कारण देत विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने तिचा दावा फेटाळला होता. तसेच ‘जैन वाणी’चा राज्याच्या ओबीसी यादीत समावेश नसल्याचेही समितीने नमूद केले होते.
यासाठी प्राची नेटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठाने प्रकरणाची सुनावणी करत समितीचा आदेश रद्द केला. न्यायालयाने म्हटले की, शाळेच्या दाखल्यातील धर्मासंबंधी उल्लेखाला खूप महत्त्व देण्यात आले आणि पुराव्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.
दक्षता पथकाच्या अहवालातही प्राची नेटके यांचे कुटुंब ‘वाणी’ समाजातील असल्याचे स्पष्ट झाले होते. कुटुंब जैन धर्माचे पालन करत असले तरी त्यामुळे त्यांची जन्मजात असलेली जात बदलत नाही, असे न्यायालयाने अधोरेखित केले. यानंतर न्यायालयाने संबंधित समितीला चार आठवड्यांच्या आत प्राची नेटके यांना ‘वाणी’ समाजाचे जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले.


