काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकीय कारकिर्द शेवटाकडे आली असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू असून मोदी सरकार बॅकफूटवर आहे, असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत असताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सरकारच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे.
अमित शाह यांना उपपंतप्रधान व्हायचे आहे
भाजपामध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचे सांगताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “अमित शाह म्हणत आहेत, मला उपपंतप्रधान करा. म्हणजे मी पुढचा चेहरा असेन. नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे. ही मोदी सरकारच्या शेवटाची सुरुवात झाली आहे. अडीच वर्षांत हे काही होणार नाही. आम्ही २०२९ ची वाट पाहू. महात्मा गांधींच्या शांततेच्या मार्गाने देशात निश्चितच सत्ताबदल होईल.”
“पंतप्रधान मोदी यांनी आजवर केलेल्या खोट्या घोषणा खपून गेल्या. १५ लाख रुपये खात्यात टाकणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, नोटबंदीमुळे ५० दिवस मागणे, लॉकडाऊनमध्ये केलेल्या घोषणा खपून गेल्या. गुजरात मॉडेल, विश्वगुरू वगैरेही हवेत विरून गेले. युवकांनी या घोषणा उघड्या पाडल्या आहेत. ही बोगसगिरी आता चालणार नाही, हे युवकांनी सांगितले आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी, मोहन भागवत युवकांबरोबर बोलत आहेत”, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.


