राज्यात गेल्या आठवड्यापासून पूर्वमान्सूनने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता मान्सूनने केरळमध्ये आठ दिवस आधीच सरप्राईज एन्ट्री घेतली आहे. मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. यापूर्वी 2009 मध्ये मान्सून केरळात 23 मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर 15 वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे. आता पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असून कोकणात सध्या जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु असून. मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो.
गेल्या काही दिवसांपासून तळकोकणात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला वळीवाच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे आणि वादळी वाऱ्यांमुळे सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.
नैऋत्य मोसमी पाऊस आज (24 मे) केरळमध्ये दाखल झाला आहे. दरवर्षी 1 जूनच्या तारखेला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा आठवडाभर आधीच दाखल झाला असल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं. 2009 नंतर भारताच्या भूमीवर हंगामी पावसाची ही पहिलीच सुरुवात असल्याचं IMD नं म्हटलं. मान्सून लवकर दाखल झाल्याने सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चित्र आहे.
केरळनंतर पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनचा प्रवेश दक्षिण आणि मध्य भारतात होणार आहे. दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरु आहे.येत्या 36 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असून मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.मान्सून केरळात दाखल झाल्यामुळे आता देशाच्या इतर भागांतही त्याचा विस्तार हळूहळू होणार असून शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मान्सून पावसाचा शेतकऱ्यांना लाभ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


