दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज, गुरुवारी नगर शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलाच्या आवारात असलेल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व तरुण उपस्थित होते. यावेळी त्यांनी तिरंगा ध्वज उंचावत आंदोलनात सहभाग घेतला.
अण्णा हजारे सहा वर्षानंतर मौन आंदोलन केले आहे. यापूर्वी सन २०१९ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राळेगणसिद्धी येथे मौन आंदोलन केले होते. काही दिवसांपूर्वी माहिती अधिकार कायद्याच्या नियमावलीमध्ये राज्य सरकारने जाचक बदल केले याकडे लक्ष वेधत त्या नियमावली मागे घ्याव्यात या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र त्यांचे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच, दोन दिवस आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निमावलीला स्थगिती दिल्याने हजारे यांनी आंदोलन स्थगित केले होते.
आज दुपारी साडेबाराच्या सुमारास अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथून नगरला आगमन झाले. भारतमातेचे पूजन करून त्यांनी मौन व्रत स्वीकारले. अनामप्रेम संस्थेच्या अंध विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर गीत गायन केले. अण्णा हजारे यांच्या चळवळीतील कार्यकर्ते ॲड. श्याम आसावा, ॲड. कारभारी गवळी, दीपक पापडेजा, संदीप कुसळकर, सुधीर भद्रे आदींनी आंदोलनाची पार्श्वभूमी विषयक केली. दरम्यान राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, अशोक मासाळ, विलास पेद्राम आदींनी आंदोलनस्थळी दाखल होत हजारे यांना पाठिंबा दिला. विविध विद्यार्थ्यांनी नीट परीक्षांर्थींच्या आत्महत्येकडे लक्ष वेधत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या धिक्काराच्या घोषणाही देण्यात आल्या.


