कोपरगाव येथील एका तरूणीला श्रीरामपूर शहरात बंदुकीचा धाक दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये बाबू साळवे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक सागर बेग, त्याचा भाऊ सोनू बेग यांचा समावेश आहे.
पीडित महिलेने बुधवारी सकाळी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. घटनास्थळ श्रीरामपूर शहरातील असल्याने स्थानिक पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या तरूणीचे फिर्यादीत म्हटले की, काही दिवसांपूर्वी आई वडीलांसोबत भांडण झाल्यामुळे मी श्रीरामपूर येथे माझ्या आजीकडे राहण्यास गेले होते. तिथे राहत असताना बाबू साळवे (रा.सरस्वती पार्क, श्रीरामपूर) हा नेहमी त्याच्या सोबतच्या पोरांसह तिथे यायचा. येता जाता तो माझ्या मागे मागे फिरून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता.
14 फेब्रुवारी 2026 रोजी त्याने माझा हात धरून मला बोलण्यासाठी आग्रह केला. मी त्याला नकार दिला तर त्याने मला सांगितले की, तो सागर बेग व सोनू बेगच्या टोळीत काम करतो. मी जर त्याच्यासोबत बोलली नाही तर तो सागर बेग आणि सोनू बेग यांना सांगून मला व माझ्या मुलांना गायब करून टाकीन. त्यानंतर असेच बाबू साळवे याने वारंवार मला धमकी देवून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करून मला धमकावून माझा मोबाईल नंबर घेतला व वारंवार मला फोन करायचा.
मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात त्याने मला सागर बेग, सोनू बेग यांची धमकी देवून व माझ्या मुलांना मारून टाकण्याची धमकी देवून वॉर्ड नं.3 मध्ये पाटाच्या कडेला त्याच्या रुमवर बोलावून घेतले व माझ्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. त्यानंतर वेळोवेळी त्याने मला सागर बेग, सोनू बेग यांची धमकी देवून वारंवार त्याचे रुमवर बोलावून माझ्यावर शारीरिक अत्याचार केले आहेत. एकदा त्याने मला त्याचे रुमवर नेले तेव्हा सागर बेग व सोनू बेग हे त्याच्या रुमवर होते. तेव्हा मला सागर बेग, सोनू बेग व बाबू साळवे तिघांनी तीन पिस्तुल दाखवून ते मला म्हणाले की, बाबू साळवे आमचा पंटर आहे, तू याच्यासोबत रहा, याच्याशी संबंध ठेव नाहीतर तुला व तुझ्या मुलांना संपवून टाकू, कुठे गायब करू काही समजू देणार नाही अशी धमकी दिली. त्यांच्या धमकीमुळे मी खूप घाबरून गेले. या लोकांच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलांना श्रीरामपूर येथील शाळेतून काढून घेतले व मी मे महिन्यात कोपरगाव येथे आई वडीलांकडे निघून आली. तेव्हापासून बाबू साळवे हा मला त्याच्या मोबाईलवरून वारंवार फोन करून धमकी देत होता व मी हे सगळ्यांना सांगेल असे ब्लॅकमेल करत होता.
25 जून 2026 रोजी सुतगिरणी फाटा येथे माझी मैत्रीणीच्या बहिणीच्या मुलाचे लग्नाच्या वेळी मी तिथे गेले होते. तेथे रात्री बाबू साळवे हा आला. त्याने तिथे धमक्या देवून मला व माझी मैत्रीणीला लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. तेव्हा मी व मैत्रिणीने कामगार हॉस्पीटल येथे उपचार घेतला होता. त्यानंतर बाबू साळवे हा वारंवार मला फोन करून सागर बेग, सोनू बेग यांची धमकी देवून त्याच्यासोबत राहण्यासाठी ब्लॅकमेल करत आहे. सदर प्रकारामुळे मी खूप घाबरून गेलेली आहे. सागर बेग, सोनू बेग यांची खूप दहशत आहे. त्यांनी मला समक्ष धमकी दिल्यामुळे मी खूप भितीमध्ये होते. त्यामुळे तक्रार देत नव्हते व हे प्रकरण कोणालाही सांगितले नाही. सोनू बेग याला अटक झालेली आहे हे मला माहित झाले तो आता जेलमध्ये आहे. त्याला आता बाहेर येता येणार नाही अशी खात्री झाल्याने मी आता हिंमत करून तक्रार देण्यासाठी आलेले आहे. त्यावरून पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


