केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला रात्री हिंसक वळण लागलं. यामध्ये दोन निरीक्षक आणि आणखी एका पोलिसासह दिल्ली पोलिसांचे अनेक कर्मचारी जखमी झाले. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स आणि पोलिसांनी मर्यादित बळाचा वापर करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जंतरमंतरवर ४ हजार लोकांची क्षमता असताना तिथे अंदाजे १२ हजार लोक जमले होते. यामुळे ही गर्दी टॉलस्टॉय मार्ग आणि संसद मार्गावर पसरली.दिल्ली पोलिसांनी अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, कनॉट प्लेस येथील टॉलस्टॉय मार्गाजवळ रात्री साडेआठच्या सुमारास हा हिंसाचार झाला, तेथे काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगड आणि बाटल्यांनी हल्ला केला. यात कनॉट प्लेसचे एसीपी विवेक भगत जखमी झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात हलवलं. पोलिसांनी सांगितलं की, “काही मिनिटे परिस्थिती तणावपूर्ण होती, परंतु आता शांतता पूर्ववत झाली आहे.”
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जंतर-मंतरवर जमलेले आंदोलक टॉलस्टॉय मार्गाच्या दिशेने सरकले आणि तिथे आंदोलनाला हिंसक वळण लागलं. जमावाने या भागात तैनात असलेल्या दिल्ली पोलीस आणि आरएएफच्या जवानांवर दगड आणि बाटल्या फेकल्याचं सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला आंदोलकांना शांततेत पांगवण्याची विनंती केली. पोलिसांनी सीजेपी नेते आणि आयोजकांनाही घटनास्थळी बोलावून जमावाला शांतता राखण्याचं आवाहन करण्यास सांगितलं, परंतु आंदोलकांनी त्यांच्या स्वतःच्या आयोजकांच्या आवाहनाकडेही दुर्लक्ष केले.हिंसाचार वाढल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. या चकमकीदरम्यान काही आंदोलक काठ्या घेऊन आले होते, तर काही जण तलवारी दाखवून धमकावत होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर आरएएफ आणि दिल्ली पोलिसांनी मर्यादित बळाचा वापर केला आणि परिसर रिकामा करण्यापूर्वी दोन ते तीन अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.


