अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा परिषदेत सरळसेवेने नियुक्ती झाल्याबाबतचे बनावट ई-मेल नागरिकांना प्राप्त होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगर जिल्ह्यातील दोघांना बनावट ई-मेलद्वारे त्यांची जिल्हा परिषदेत नोकरीसाठी नियुक्ती झाल्याचे कळवण्यात आले.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
प्रशासनाने काय स्पष्ट केले?
जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सध्या जिल्हा परिषदेमार्फत कोणत्याही प्रकारची पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.
जिल्हा परिषदेतील पदभरती ही पूर्णपणे शासनस्तरावरून निश्चित केलेल्या अधिकृत कार्यक्रमाच्या आधारेच केली जाते. शासनाकडून जाहिरात देऊन अर्ज मागवले जातात आणि त्यानंतर पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेऊनच योग्य उमेदवारांची निवड केली जाते.
निवड झालेल्या उमेदवारांची यादी केवळ जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. जिल्हा परिषद स्तरावरून कोणत्याही उमेदवाराला वैयक्तिक ईमेलद्वारे नियुक्तीपत्र किंवा निवडीचा संदेश पाठवला जात नाही.
जर कोणाला जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या नावाने पदभरतीबाबत वैयक्तिक ईमेल प्राप्त झाला असल्यास, तो पूर्णपणे ग्राह्य धरू नये. अशा संदेशाची दखल न घेता, कोणत्याही प्रकारचा संशय आल्यास थेट जिल्हा परिषद प्रशासनाशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी. कोणत्याही फसव्या ईमेल्स किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राहुल शेळके यांनी केले आहे.


