श्रीरामपूरमधील युवा हॉटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपी आणि संबंधित संघटित गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई करण्याच्या मागणीसाठी दुबय्या कुटुंबाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
15 ऑगस्टपासून महात्मा गांधी पुतळ्यासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाला सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी आंदोलनस्थळी भेट देऊन कुटुंबीयांची भेट घेतली. पोलिसांनी यापूर्वी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर नेमकी कोणती कारवाई झाली, याची माहिती पोलीस अधीक्षकांनी श्रीरामपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन द्यावी, अशी सूचना आपण करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन अधिक प्रभावी कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
श्रीरामपूरमधील युवा उद्योजक आकाश दुबय्या यांची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. मात्र, या हत्येमागील टोळीतील मुख्य सूत्रधार किंवा तथाकथित ‘आका’ अद्याप कायद्याच्या कचाट्यात आले नसल्याचा आरोप दुबय्या कुटुंबीयांनी केला आहे.
घटनेनंतर संबंधित आरोपी आणि संघटित गुन्हेगारी टोळीवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे. मात्र, हत्या होऊन महिना उलटल्यानंतरही अपेक्षित कारवाई न झाल्याने कुटुंबीयांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. “जोपर्यंत पूर्ण न्याय मिळत नाही आणि सरकार या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नाही, तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही,” असा निर्धार दुबय्या कुटुंबाने व्यक्त केला आहे.


