मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा एक मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी शरद पवार यांच्यासह पक्षाचे आदी नेते उपस्थित होते.
दरम्यान, या मेळाव्यात जयंत पाटील यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे. जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्ष म्हणून निरोपाचं भाषण होतं. या भाषणात त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांसह विविध विषयांवर मत व्यक्त केलं. यावेळी जयंत पाटील यांनी एका कवितेच्या माध्यमातून आपली भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘मुख्य सेनापती होतो, पण सेना अजूनही सज्ज आहे. मी जातोय पण सोडत नाही’, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
“मी एक मुख्य सेनापती होतो, सेना अजूनही सज्ज आहे. नव्या युगातही शाहू, फुले, आंबेडकरांचा पुरोगामी विचार हाच आमचा ध्यास आहे. मी जातो आहे, पण सोडत नाही. एक पाऊल मागे घेतलंय, पण उद्दिष्ट मात्र ठाम आहे. कालही मी महाराष्ट्रासाठी होतो आणि आजही आहे. नाव असेल किंवा नसेल, पण कामांतूनच ओळख मिळेल. कारण मी जयंत आहे”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या भाषणानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला.
या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे आदी नेते उपस्थित होते.


