मनसे सोडून शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते बनताच प्रकाश महाजन यांनी ठाकरे बंधू आणि भाजपवर हल्लाबोल केला. आपली पहिली तोफ ठाकरेंवर डागताना महाजन यांनी भाजपलाही सोडलं नाही. भाजपला आता मुंडे-महाजनांची गरज राहिली नाही, अशा शब्दात त्यांनी सुनावलं. ठाकरे बंधूंनी हिंदुत्त्व सोडल्याचं सांगत तुम्ही हिंदू म्हणून कुठे आहेत, आता त्यांना मुंबईत अस्तित्व टिकवायचे आहे, असे म्हणत शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी शिवसेना आणि मनसेच्या युतीवरुन ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, भाजपवरही निशाणा साधत आपण भाजपात का गेलो नाही, भाजपने मला तीन महिने ताटकाळत ठेवलं. आता, भाजपला मुंढे-महाजनांची गरज नाही, जे आहेत त्यांना संभाळा अशा शब्दात प्रकाश महाजनांनी शिवसेनेतील प्रवेशानंतर पहिल्यांदाच भाजपवर जोरदार टीका केलीय.
मी भाजपमध्ये गेलो नाही, कारण त्यांनी मला तीन महिने ताटकळत ठेवलं. मी त्यांची एंट्रन्स परीक्षा पास झालो नाही, पण ज्यांनी भाजपवर टीका केली ते सगळे आज भाजपात आहेत. दिनकर पाटील भाजपावर बोलले तो भाजपात आहे. भाजपच्या घराला दार नाही पण पहारेकरी आहेत हे सांगण्यासाठी मी मुनगंटीवार यांना फोन केला, पण त्यांनी उचलला नाही, असेही प्रकाश महाजन यांनी सांगितले.
लहान्या कार्यकर्त्याने निष्ठा सोडली की गद्दार म्हणतात, जोपर्यंत अस्तित्व आहे तोपर्यंत आता राहणार. मी म्हणलो भाऊ भाऊ एकत्र या. पण, ते मराठी माणसापासून दूर जाताना दिसले ते मला खटकले. चंदुमामा सोडा, रशीद मामू आला, हे राज ठाकरे यांना खटकले नाही. मी कुठे स्वार्थासाठी हे म्हणलो होतो? असा सवालही प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंना विचारला. एकत्र आल्यानंतर अनेक जण आठवत आहेत. शिवसेना-मनसे युतीत ज्या जागा पाहिजे होत्या, त्यांना मिळाल्या नाहीत. त्यामुळे, अनेकजण नाराज आहेत, त्या दिवशी बाळा नांदगावकर कुठे गेले होते? असा थेट सवाल महाजन यांनी विचारला.


