राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरू असून आज महायुतीच्या जागावाटपाची घोषणा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, त्याआधी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून प्राजक्त तनपुरे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला ऐनवेळी दुसरा उमेदवार द्यावा लागला होता. एवढंच नाही तर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमधून उमेदवारी मागे घ्यावी म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीच्या पोटनिवडणुकीमधून माघार घेतली होती.
दरम्यान, आज अखेर प्राजक्त तनपुरे यांनी मुंबईत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे यांच्यासह आदी नेत्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
“राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सभापती राम शिंदे यांच्यासह भाजपाच्या सर्वच नेत्यांचे मी आभार मानतो, त्यांनी आम्हाला भाजपात प्रवेश दिला. आमच्या सर्वच कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की माझ्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लागावे. माझा मतदारसंघ हा तीन तालुक्यांचा आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रश्न मार्गी लागावे. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वीजेचे, पाण्याचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून सुटावेत. अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. मी आज जास्त काही बोलू शकणार नाही. मात्र, यापुढे पक्ष जी आमच्यावर जबाबदारी देईल, ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचं काम आम्ही सर्वजण करू असा विश्वास मी आपल्याला देतो”, असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे.


