सोलापुरातील मंगळवेढ्यात एका रिलस्टारनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. ज्या हॉटेलमध्ये रिल करुन लाखो फॉलोअर्स मिळवले, त्याच हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेत सोलापुरातील प्रसिद्ध रिलस्टार रोहिणी पाराध्ये हिनं आपलं आयुष्य संपवलं. 25 वर्षांच्या विवाहित रोहिणी पाराध्येनं एवढं टोकाचं पाऊल का उचललं हाच प्रश्न सर्वांच्या मनात होता. सुरुवातीला तणाव आणि त्यातून झालेल्या वादातून रोहिणीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात होतं. पण, आता या प्रकरणात मोठा ट्वीस्ट आलाय. पोलिसांनी रोहिणी पाराध्ये हिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केलाय.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील रील स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्येनंतर तब्बल 25 दिवसांनी रोहिणीच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. रोहिणी पाराध्ये हिनं आपल्या हॉटेल ग्रामपंचायत या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर रोहिणीच्या आत्महत्येचं कारण शोधलं जात होतं. याबाबत पोलिसांनी सीडीआर तपास देखील केला. मात्र, या प्रकरणात कुठलेच धागेदोरे हाती लागले नाहीत. पण, आता पोलिसांनी रोहिणीच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे खळबळ माजली आहे. रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिचे वडील बाळू शिवशरण यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रोहिणीचा पती निलेश पारामध्ये विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निलेश पाराध्ये रोहिणीला तिच्या मनाविरुद्ध हॉटेलमध्ये काम करायला लावत होता. तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. त्यामुळेच तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी रोहिणी पाराध्ये हिचा पती निलेश पाराध्ये विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे रोहिणीच्या आत्महत्या प्रकरणात 25 दिवसानंतर या प्रकरणाला नवं वळण प्राप्त झालंय.
प्रसिद्ध रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्या प्रकरणी अनेक धक्कादायक कारणं समोर येत आहेत. तिच्या वैयक्तिक आयुष्यात तणाव निर्माण झालेला. त्यामुळे काही वादही निर्माण झालेले, याच कारणामुळे तिनं टोकाचं पाऊल उचललं असू शकतं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशातच आता या प्रकरणी आणखी एक कारण समोर येत आहे, ते म्हणजे रोहिणीचा दुसरा विवाह. रोहिणीच्या खासगी आयुष्याबद्दल आता माहिती समोर आली आहे. निलेश पाराध्येला भेटण्याआधी रोहिणीचं लग्न झालं होतं. पहिल्या लग्नातून विभक्त झाल्यानंतर रोहिणी निलेशला भेटली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी प्रेमविवाह केला. पण, अलिकडे हॉटेल ग्रामपंचायतच्या सुरू झालेल्या आणखी दोन शाखा आणि कामाचा ताण वाढल्यामुळे दोघांमधील वाद वाढला, असं बोललं जात आहे. पण, रोहिणीच्या मृत्यूचं ठोस कारण समोर आलेलं नाही.


