राहुरी विधानसभा पोटनिवडणुक लढतीचे चित्र स्पष्ट; सात जण निवडणुकीच्या रिंगणात

राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज ९ एप्रिल या अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी ८ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपाचे अक्षय शिवाजीराव कर्डिले, महाविकास आघाडीकडुन शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीकडुन संतोष चोळके असे तिरंगी लढतीचे चिञ स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून प्रहार संघटनेचे सुरेश लांबे, उबाठा शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, महेश हापसे, अर्थव म्हसे हे नशीब अजमावत आहेत. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची २३ एप्रिलला पोटनिवडणुक होणार आहे. ९ एप्रिल या अखेरच्या दिवशी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले बाळासाहेब जाधव, नागेश जाधव, अनिल जाधव, नामदेव पवार, सविता शेटे, संभाजी धोंडे, साहेबराव म्हसे, रविंद्र मोरे या आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.

उमेदवारी अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस असल्याने काही अपक्ष उमेदवार नाॅटरिचेबल झाले होते. वंचित बहुजन आघाडीकडुन संतोष चोळके हे निवडणूकीला सामोरे जातील अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी राहुरी येथे प्रसार माध्यमाशी बोलताना दिली.

सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात होती. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अचानक माघार घेतली होती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तनपुरेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी 6 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात ही निवडणूक बिनविरोध होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात राजकारणाला अनपेक्षित वळण मिळालं. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मास्टरस्ट्रोक खेळत गोविंद मोकाटे यांना उमेदवारी जाहीर केली आणि निवडणुकीत ट्विस्ट आला.त्यामुळे भाजपसमोर थेट लढत उभी राहिली आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीनेही संतोष चोळके यांना उमेदवारी देत निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे तिसरा महत्त्वाचा पर्याय मतदारांसमोर उभा राहिला आहे. अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या संख्येने अर्ज दाखल केल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, बिनविरोध होण्याच्या उंबरठ्यावर असलेली राहुरी पोटनिवडणूक आता बहुरंगी आणि चुरशीची होणार आहे. भाजपचे अक्षय कर्डिले यांच्यासमोर आता केवळ औपचारिक लढत नसून, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे खरी कसोटी लागणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles