सोलापूरची रीलस्टार तरुणी रोहिणी पारधे हिने आपल्या हॉटेल ग्रामपंचायतच्या किचनमध्ये गळफास लावून जीवन संपवले आहे. अगदी कष्टातून उभं केलेलं हॉटेल, रील्स बनवून मिळालेली प्रसिद्धी, पदरात अफाट प्रेम करणारा नवरा, सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक रोहिणीने आयुष्य संपवल्याने सोलापूरसह सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेला आता तीन दिवस उलटले आहेत. दरम्यान, पती निलेश हा रोहिणीच्या विरहात व्याकूळ झाला आहे.
“तू मला सोडून जायचं नव्हतं”
निलेश पारधे याने फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “चिमणे, परत ये गं, तुला खूप काही सांगायचं बाकी आहे” अशा शब्दांत त्याने आपल्या पत्नीला आर्त हाक मारली आहे. “बायको, मला सोडून तू जायचं नव्हतं”, असेही निलेशने पोस्टमध्ये लिहिले आहे. निलेशची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून अनेकजण निलेशचे सांत्वन करताना दिसत आहेत.
निलेशने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
निलेशने फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “माझी बायको, माझ्या चिमणे, मला सोडून जायचं नव्हतं ग… या पाच वर्षांच्या सोबतीत तिने मला फक्त साथच दिली नाही, तर माझं संपूर्ण आयुष्य उभं केलं. माझ्या प्रत्येक अडचणीत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. माझ्यासाठी तिने किती हाल सोसले, किती कष्ट केले, याची गणतीच नाही.”
“जेव्हा मी खचून जायचो, तेव्हा ती मला आधार द्यायची. जेव्हा सगळे दूर व्हायचे, तेव्हा ती माझा हात घट्ट धरून उभी राहायची. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळातून तिने मला बाहेर काढलं. आज चांगले दिवस यायला लागले होते… आपल्या स्वप्नांना आकार यायला लागला होता… पण त्याच वेळी तू मला एकटं करून निघून गेलीस,” असे निलेशने पोस्टमध्ये लिहिले आहे.
रोहिणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास सुरू आहे. या घटनेने सोलापूरसह सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे.


