राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. त्यामुळे, सध्यातरी अजित पवारांच्या राजकीय वारसदार सुनेत्रा पवार आहेत. मात्र, बारामतीमधील मतदानादिवशीच 2029 च्या निवडणुकीत बारामतीतून कोण? याची चर्चा रंगली होती. रोहित पवार आणि जय पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ही चर्चा राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरले. तसेच, युगेंद्र पवार यांनीही या चर्चेत सहभाग घेतल्यामुळे बारामतीच्या एक जागेसाठी तीन पवार मैदानात असल्याची चर्चा रंगली. मात्र, आता जय पवार यांनी पुन्हा एकदा 2029 च्या निवडणुकीवर भाष्य केलं. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार 2029 च्या मुख्यमंत्री म्हणून निवडणूक लढवतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केलीय.
सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्याने खासदारकीची जागा रिकामी झाली असून तिथे तुमचे नाव चर्चेत आहे, असा प्रश्न विचारला असता, चर्चा होतेय पण मी इथेच सर्वांसाठी काम करेल, असे म्हणत जय पवार यांनी आपण खासदार म्हणून जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, बारामतीत 2029 च्या विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगानेही राष्ट्रवादीचे युवा नेते तथा अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी आमची सहकाऱ्यांसोबत चर्चा झाली, सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की, दादांना एकदा मुख्यमंत्री पाहायचं आहे. आता, वहिनी देखील खूप कष्ट घेत आहेत, मला वाटतं 2029 ला बारामतीतून विधानसभेला वहिनीच उभा राहतील आणि आमची सर्वांची आशा आहे की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे, असे वक्तव्य जय पवार यांनी केले आहे.अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं ही बारामतीकरांसह राज्यातील अनेकांची इच्छा होती, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, अजित पवारांचे अपघाती निधन झाल्याने ती इच्छा अपूर्ण राहिली. मात्र, आता सुनेत्रा पवार ह्याच मुख्यमंत्री बनून दादांची इच्छा पूर्ण करतील अशी आशा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि बारामतीकर बाळगत आहेत. त्यातच, आज जय पवार यांनी 2029 मध्ये सुनेत्रा पवार ह्याच बारामतीच्या उमेदवार असतील हे स्पष्ट केले, मात्र मुख्यमंत्रीपदाच्या उमदेवार म्हणून त्या निवडणूक लढवती अशी आम्हाला आशा असल्याचंही त्यांनी म्हटलं.


