अहिल्यानगर- एमबीएच्या ३ विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील चंद्रपूर गावात ही घटना घडली. या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, साठवण तलावात बुडून ३ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील चंद्रपूर गावात ही घटना घडली. हे तिन्ही तरुण एमबीएचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. साठवण तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. स्थानिक त्यांच्या मदतीसाठी धावले पण त्यांना तिघांना वाचवण्यात अपयश आले.
२४ वर्षीय अभिषेक गंगाधर जाधव, २३ वर्षीय प्रवीण प्रभाकर रसाळ आणि २६ वर्षीय महेश अशोक शिंदे या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. लोणी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
दरम्यान, पुण्या जवळच्या पानशेत धरणाच्या कालव्यामध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आळी आहे. तन्मय संदीप शेठे (वय २२ वर्षे) असं या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील नऱ्हे येथे राहणारा होता. तन्मय पानशेत धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी उतरला असताना अचानक खोल पाण्यात ओढला गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना समजताच वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.


